महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जामीन मिळाला आहे. 100 दिवसांनी संजय राऊत जेलबाहेर आले आहेत. जेलमधून बाहेर येताच संजय राऊत यांची तोफ पुन्हा धडाडली आहे. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलं आहे.
‘100 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होतो. तुरुंगात अशी परिस्थिती असते, बाहेर काय चाललंय कळत नाही. साधनं नसतात. आता पाहतोय की बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कणा तुटलेला नाही. ती चालतेय धावतेय हे मी पाहतोय. शिवसैनिक लढणारा माणूस आहे. माझं अख्खं आयुष्य बाळासाहेब, उद्धव ठाकरेंसोबत गेलं आहे. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची. बाकी सगळ्या धोतऱ्याच्या बिया आहेत, कडू’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला, ते एबीपी माझासोबत बोलत होते.
‘महाराष्ट्र, मुंबई कोणाच्या मागे आहे ते हळू हळू कळेल. सध्या सगळं तात्पुरतं राजकारण सुरू आहे. बरेच दिवस मी माहिती घेतली नाही, मला समजून घेण्याची साधनं नव्हती. हळू हळू परत कामाला लागू’, असं म्हणत राऊतांनी पुढची रणनिती सांगितली.
‘समोर जे भगवे झेंडे दिसत आहेत, हाच भगवा मुंबई महापालिकेवर गेली 30-35 वर्षांपासून फडकत आहे. तो तसाच फडकत राहणार. जे हात लावतील ते जळून जातील, खाक होतील. या भगव्याचं तेज बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे. आता तर मशाल आहे’, असं विधान करून राऊत यांनी मुंबई महापालिकेत पुन्हा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला.