महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जामीन देण्यात आला आहे. संजय राऊत आर्थर रोड जेलच्या बाहेर आल्यानंतर शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पहिले सिद्धीविनायक मंदिरात गेले, यानंतर त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर संजय राऊत त्यांच्या घरी परतले. घरी येताच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. 103 दिवस आतमध्ये होतो, आता 103 आमदार निवडून येतील, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, असं संजय राऊत म्हणाले.
‘अटकेने सुरूवात झाली, आता सुटलो आहे, आता सुसाट सुटायचं. मला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. आता रडायचं नाही तर लढायचं. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं.
‘शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला, पण ती तुटली नाही. मला अटक करून त्यांनी किती मोठी चूक केली त्यांना कळेल. देशातल्या राजकारणातली सगळ्यात मोठी चूक संजय राऊतला अटक करणं आहे. मला कितीही वेळा अटक करा, शिवसेनेला त्यागणार नाही, भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलो, या भगव्यासोबतच जाईन,’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
‘महाराष्ट्रातले बोके खोक्यावर बसले आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे बाळासाहेबांची शिवसेनाच ओके. गद्दारांना बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मुंबई आपल्या हातातून काढून घेण्यासाठीच शिवसेना फोडली,’ असा घणाघात संजय राऊतांनी केला.
‘उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले त्यांचा उर भरून आला, मलाही भरून आलं. आमची सिक्युरिटी काढली, काढा ना तुम्हाला घाबरतो का? मला चिरडणं, मला संपवणं इतकं सोपं नाही,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.