महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, एअरबसचा प्रकल्पही असाच अचानक कसा गेला? हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूकही गेली. महाराष्ट्रातील उद्योग पळवून मोदींनी लाखो मराठी तरुणांच्या नोकऱया हारवून घेतल्या, अशी तोफच कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर डागली.
‘भारत जोडो’ यात्रेच्या महाराष्ट्रातील तिसऱया दिवशीच्या पदयात्रेची सांगता नांदेड जिह्यातील कृष्णूर एमआयडीसी येथे झाली. यावेळी झालेल्या चौकसभेत राहुल गांधी यांनी वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्दय़ांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारी उद्योग खाजगी उद्योगपतींना विकले जात आहेत. सरकारी नोकऱया नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅस महाग झाले. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. जनतेचा आवाज मोदी सरकार ऐकत नाहीत. संसदेत बोलण्यास सुरू केले की लगेच माईक बंद केला जातो, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
देशातील तरुण लष्करात भरती होऊन देशसेवा करू पहात आहे पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फेरले आहे फक्त चार वर्षेच सेवा करा आणि घरी बसा अशी व्यवस्था करून ठेवली आहे. शेतकरी, तरुण, यांच्याकडून ऐकतो तेव्हा वाईट वाटते. 6 वर्षापूर्वी नोटबंदी केली त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. नोटाबंदी व जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्सुनामी आली, असे राहुल गांधी म्हणाले.
दोन महिन्यापूर्वी मी ही पदयात्रा सुरू केली. शेतकरी, तरुण, महिला, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. हिंदुस्थान समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते आणि राज्याची अवस्था रस्त्यावरून कळते, असे राहुल गांधी म्हणाले.