राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीय राजकारणाला सुरुवात; राज ठाकरे यांचा पुन्हा आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ डिसेंबर । राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून फंडिग गोळा करण्यात आलं. 1999 पासून हे विष राज्यात कालवलं गेलं, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

जातीच्या राजकारणासाठी महाराष्ट्रात या गोष्टी केल्या जात आहेत. जातीच्या राजकारणासाठीच शिवाजी महाराजांचा अवमान केला जात आहे. या आधी लोकं जन्माला आली त्यांना काय इतिहास माहीत नव्हता का? तो आताच जागृत झाला का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

एनसीपीपासून जातीचं राजकारण सुरू झालं. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत. त्यांची सर्व भाषणं काढून पाहा. व्यासपीठावर शाहू, फुले, आंबेडकर असतात. मी एका मुलाखतीत त्यांना याबाबत विचारलं होतं. त्यावर शाहू, फुले, आंबेडकर हा विचार आहे, असं ते म्हणाले होते. मग शिवाजी महाराज हा विचार नाही का? त्या विचारावरच पुढचा विचार आला ना?, असा सवाल त्यांनी केला.

शिवरायांचं नाव घेतलं तर मुस्लिम मते जातात. त्यामुळे कोणत्या तरी टोळ्या उभ्या केल्या जातात फंडिग गोळा करण्यासाठी. 1999 पासून महाराष्ट्रात हे विष कालवलं गेलं, असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काही संबंध होता का? कोणीही उभं राहतं काहीही बोलतं. त्याला तुम्ही नको ती प्रसिद्धी देत असता. त्यामुळे हे घडतंय, असा आरोपही त्यांनी केला.

सिंधुदुर्गात पक्षात गटबाजी आहे. त्याला चाळण लावणं गरजेचं आहे. संघटनात्मक विस्कळीतपणा दूर करणं गरजेचं होतं. त्यासाठी आलो आहे. पक्षाचे हितचिंतक, महाराष्ट्र सैनिक अशा गोष्टींना कंटाळून घरात बसलेत. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी हा दौरा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *