महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ डिसेंबर । हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होताना दिसत आहे. बदलत्या हवामानामुळं पुढच्या काळात हिंद महासागर (Indian Ocean), अरबी समुद्राच्या (Arabian Sea) उत्तरेकडील क्षेत्र आणि मध्य बंगालच्या उपसागरात वादळी लाटांच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळं जीवितावर आणि मालमत्तेवर, विशेषत: किनारपट्टीच्या भागात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे संकट टाळण्यासाठी वेळेवर योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
अलिकडच्या काळात तीव्र लाटा उसळण्याच्या घटना वारंवार नोंदवल्या गेल्या आहेत. त्या किनारपट्टीवरील लोकसंख्येच्या उपजीविकेवर, पायाभूत सुविधांवर आणि समुद्राशी संबंधित उपक्रमांवर प्रचंड परिणाम करू शकतात. वादळाची तीव्रता आणि मार्ग बदलण्यासोबतच मोठ्या लाटा उसळत आहेत. याचा परिणाम किनारपट्टीवर तसेच जमिनीची धूप होण्याचे प्रमाण, पुराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणार्या तीव्र लाटा आणि त्याचे परिणाम प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सतत होत आहेत. त्यामुळं, वेळेत किनारपट्टी भागात योग्य ते नियोजन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीनं काम करणं गरजेचं आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीचा उपयोजित विज्ञान विभाग; भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर आणि भारतीय सागरी माहिती सेवा राष्ट्रीय केंद्र , हैदराबाद मधील शास्त्रज्ञांच्या चमूने हिंद महासागरामधील मोठ्या लाटांच्या उंची निर्देशांकांच्या माध्यमातून भविष्यातील संभाव्य बदलांचा अंदाज वर्तवला आहे. त्यांचे हे संशोधन ‘क्लायमेट डायनॅमिक्स’ या नियतकालिकात प्रकाशित देखील झालं आहे. भविष्यातील लहरी हवामानात वर्तमानापेक्षा मोठ्या प्रमाणात लक्षणीयरीत्या बदल घडू शकतात हे दर्शविण्यासाठी स्प्रिंगरने अलीकडेच डेटासेटचा वापर केला आहे. आरसीपी 4.5 आणि 8.5 या दोन्ही परिस्थितींमध्ये दक्षिण हिंद महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण होण्याच्या दिवसांमधील बदल तीव्र होण्याचा अंदाज आहे. लाटांच्या वेळी निर्माण होणाऱ्या वादळाचा कालावधी उत्तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, आग्नेय हिंद महासागर आणि दक्षिण हिंद महासागरावरआरसीपी 8.5 परिस्थितीत बळकट होत असल्याचे दिसून येते आहे.