महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ जानेवारी । देशातील नामांकित उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसात राजकीय क्षेत्रातील चौथ्या व्यक्तीची त्यांनी भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
गौतम अदानी यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन राज ठाकरे यांनी चर्चा केली. अदानी यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर लगेचच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेले. ही अनौपचारिक भेट असल्याचं सांगितलं जातंय. या अचानक झालेल्या भेटीगाठींमुळे चर्चेला उधाण आलंय.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला नवे रूप देण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी पूर्ण तयारी करत असल्याचं दिसतंय. गेल्या 18 वर्षांपासून विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे धारावीचा पुनर्विकास. त्यासाठी गौतम अदानी सज्ज झाल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, धारावी डेव्हलपमेंटचा मुंबईमधील मोठा प्रोजेक्ट अदानी यांच्या कंपनीला मिळाला आहे. या संदर्भात येणाऱ्या अडचणींवर अदानी हे राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत, असं सांगितलं जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 23 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.