पवारांशी बोलले, राज ठाकरेंशी बोलले, पण मुख्यमंत्री शिंदेंनी टाळला ‘मातोश्री’वर फोन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपने दोन उमेदवार जाहीर केले आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. पण, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला. पण, यावेळी मातोश्रीवर फोन करण्याचं शिंदे यांनी टाळलं.

भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पण विरोधकांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक अटळ मानली जात आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांना फोन करून कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मातोश्री अर्थात शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव गटाला फोन करण्याचं टाळलं.

एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर फोन केला नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेनं सुद्धा या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, अशी मागणीच शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली असून अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाले नाहीत. त्यामुळे शिंदे यांनी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *