महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २० फेब्रुवारी । महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी सुचवलं होतं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते मंत्री होणार होते, म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची गळ घातली, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा हे रविवारी राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले, असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं.
विरोधक काय टीका करतात, याला महत्त्व नाही. ते काहीही टीका करतील. पण, मुळात महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यासह काही जणांची नावं मुख्यमंत्रिपदासाठी सुचवली होती. पण शिंदे यांना इतर मंत्र्यांच्या तुलनेत अनुभव नाही. त्यांच्यापेक्षा इतर नेते हे ज्येष्ठ होते, त्यामुळे शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला, असा खुलासा भुजबळांनी केला, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडेही सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्रे सादर केली. आता आमदार आणि खासदारांच्या संख्येवर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. मग आयोगान पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे का मागवली होती, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थितीत केला.