“ती माझी सर्वात मोठी चूक…”, पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल स्पष्टच बोलला अक्षय कुमार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ फेब्रुवारी । हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आयुष्यातील चुका नेहमीच खुल्या मनाने स्वीकारताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवता आली नाही. या दरम्यान नुकत्याच एका कार्यक्रमात अक्षय कुमारने त्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर भाष्य केलं. एवढंच नाही तर त्याच्या आतापर्यंत चुकांवरही भाष्य केलं आणि त्या मान्यही केल्या. यावेळी त्याने पान मसाल्याच्या जाहिरातीवरही भाष्य केलं.

‘आज तक’च्या ‘सीधी बात’ या कार्यक्रमात अक्षय कुमारला, “आयुष्यात अशी कोणती चूक केली आहे की ज्यानंतर तुझ्या मनात विचार आला की ही माझ्याकडून चूक झाली आणि तू ती चूक स्वीकारली आहेस?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अक्षय कुमारने त्याच्या विमल पान मसालाच्या जाहिरातीचा उल्लेख केला.

अक्षय कुमार म्हणाला, “हो मी चुका केल्या आहेत आणि नंतर मला याची जाणीव झाल्यानंतर त्या मी स्वीकारल्याही. जसं की मी ती पान मसाल्याची जाहिरात केली होती. ती माझ्याकडून चूक झाली. मी त्याचा स्वीकार केला. त्या रात्री मला झोप लागली नव्हती. मला अस्वस्थ वाटत होतं. तर मी माझ्या मनातली गोष्ट लिहिली. मला वाटतं की माणूस प्रत्येक चुकांमधून काही ना काही शिकत असतो. मी पण शिकलो. जेव्हा मी ते लिहिलं तेव्हा माझं मन स्थीर झालं.”

दरम्यान मागच्या वर्षी अक्षय कुमारने एका पान मसाल्याच्या जाहिरातीत काम केलं होतं. ज्यामुळे सोशल मीडियावरून तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. अक्षय कुमारचं पान मसाला जाहिरातीत काम करणं चाहत्यांना अजिबात पटलं नव्हतं. ट्रोलिंगनंतर अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून माफी मागितली होती. तसेच यापुढे अशाप्रकारच्या जाहिरातीत काम करणार नसल्याचंही त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *