महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ओमप्रकाश भांगे -गेल्या काही दिवसांपासून चीन आणि नेपाळने भारताविरोधात आगळीक सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत तसेच लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. मे महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि चीनचे सैनिक हातघाईवर आले होते. यात दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले होते. लडाखमधील स्थिती तणावाची बनली आहे. चीनला कशा प्रकारे उत्तर दिले जात आहे, याची माहिती लष्कराकडून संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली.
चीनकडून लडाखमध्ये सुरु असलेल्या आगळीकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीमेवरील रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे काम चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सीमेवरील सैनिकांची संख्या वाढविली जाणार असल्याची माहितीही या बैठकीनंतर सरकारी सूत्रांनी दिली.
चीनसोबतच्या वादावर चर्चा आणि वाटाघाटीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्याचवेळी भारतीय सैनिक जेथे आहे तेथेच राहील, असे ठरविण्यात आले. भारताने जे रस्ते काम सुरू केले आहे तेही कायम राहणार आहे. चीनकडून सैनिकांची संख्या वाढवली जात आहे, या पार्श्वभूमीवर आपल्या बाजूची सैनिक संख्या वाढविण्याचेही ठरविण्यात आले आहे. लडाखमध्ये मागील काही दिवसात जे काही झाले त्या पार्श्वभूमीवर भारताकडून दक्ष भूमिका घेण्यात आली आहे.