महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी निरर्थक असल्याचं म्हटलं होतं. शिवाय गौतम अदानी यांच्यावरील आरोपांवर ते म्हणाले होते की, अदानी यांचं उर्जा क्षेत्रातील योगदान मोठं आहे. यावरून काँग्रेसकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र या टीकेला भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीक तर वाढत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.
अलका लांबा यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, घाबरलेले, लोभी लोक आज आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात आहेत. देशातील जनतेची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलदार चोरांपासून तसेच चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही ते एकटेच लढत आहेत.
Politics will come and go but this Tweet by a Congress leader on their long standing ally of 35 years and one of the India’s senior most political leaders and a 4 time CM of Maharashtra is appalling.@RahulGandhi is perverting India’s political culture ❗️ pic.twitter.com/84olg5FYOc
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2023
अलका लांबा यांच्या या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं की, राजकारण होत राहील, पण काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्या 35 वर्षांच्या दीर्घकाळ सहयोगी आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्याविषयी केलेले हे ट्विट भयावह आहे. राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती बिघडवत आहेत, असही फडणवीस यांनी म्हटलं.
एकंदरीतच देशात सध्या अदानींचा मुद्दा गाजत आहे. काँग्रेसकडून सातत्याने २० हजार कोटी कोणाचे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर विरोधकांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत असून शरद पवार यांनी केलेलं विधान त्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.