महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ एप्रिल । यंदा मोसमी पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा प्रस्ताव महापालिकेकडून सादर करण्यात आला होता. मात्र, शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढच्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. परिणामी पाणी वितरणातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठ दिवसांत उपाययोजना सादर कराव्यात. तोवर शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असा निर्णय बुधवारी घेण्यात आला.
हवामान विभागाचा यंदाचा अंदाज पाहता पाणीटंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. धरणातील उपलब्ध पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे. शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. मात्र, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी बैठकीत केली. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्यातून ग्रामीण भागासाठी दुसरे उन्हाळी आवर्तन १ मेपासून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत ११.६१ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यानुसार दुसऱ्या उन्हाळी आवर्तनात साडेचार ते पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, तर शहरासाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.