महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । देशात धार्मिक यात्रांना केंद्र सरकारकडून मोठय़ा प्रमाणात सबसिडी दिली जात होती, परंतु पवित्र अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांकडून नोंदणी शुल्काच्या नावावर सरकार पैसा उकळत आहे. यात्रा मार्गावर भाविकांकडून भरमसाट टोल वसुली केली जात आहे. त्यामुळे भाविकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
1 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. त्यासाठी भाविकांची नोंदणी सुरू आहे. लाखो भाविक दरवर्षी अमरनाथच्या दर्शनाला जातात. 2019 पूर्वी अमरनाथ भाविकांकडून फक्त 50 रुपये नोंदणी शुल्क घेतले जात होते. आता ते चौपटीने वाढवण्यात आले आहे. यात्रेकरूंना नोंदणीसाठी 220 रुपये आकारले जात आहेत.
हजारो भाविक रस्तामार्गे वाहनांनी अमरनाथला येत असतात. त्यांच्याकडूनही जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून भरमसाट टोल वसुली केली जात आहे. भाविकांना जेवण, पाणी व इतर आवश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांनाही त्यातून सूट देण्यात येत नाही.