महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । गेल्या एक आठवड्यापासून देशभरात आयटीआर दाखल करणारे लोक त्रस्त आहेत. कारण आयकर विभागाच्या पोर्टलवर करदात्यांचे व्यवहार आणि कर दायित्व अर्ज डाऊनलोड होईना झालेत. यामुळे संपूर्ण देशात रिटर्न जमा करण्याचे काम ठप्प आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोर्टलची हीच स्थिती राहिली तर आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलैपर्यंत सर्व रिटर्न भरणे कठीण होऊ शकते. आयकर तज्ज्ञ राजेश जैन म्हणतात, आर्थिक वर्ष सुरू होताच विभागाकडून आयटीआर-१ ते ७ पर्यंत सर्व रिटर्न अर्ज डिजिटली उपलब्ध केले जातात. मात्र, या वेळी १५ मेपर्यंत केवळ आयटीआर-१ ते आयटीआर-४ पर्यंतच डिजिटली उपलब्ध करून दिले. आयटीआर ५, ६ व ७ अद्याप उपलब्ध नाहीत. आयटीआर-१ ते ४ भरणाऱ्यांचेही दोन महत्त्वाचे विवरण पोर्टलवरून अपलोड होत नाहीत. त्यामुळे रिटर्न दाखल करणे अवघड झाले आहे. टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे म्हणणे आहे की, गेल्या सात दिवसांपासून देशभरात एकाही ठिकाणी हे विवरण डाऊनलोड होत नाही.
आम्ही त्रुटी दूर केल्या
काही दिवसांपासून करदात्यांना रिटर्न भरताना अडचणी येत आहेत. विभागाने आपल्या त्रुटी दूर केल्या आहेत. पुढील दोन ते चार दिवसांत सर्वकाही सामान्य होईल, अशी अपेक्षा आहे. रिटर्न फाइल करण्याची तारीख वाढवण्याची गरज पडणार नाही. कारण अजून खूप वेळ आहे. – सुरभी अहलुवालिया, प्रधान आयुक्त (मीडिया अँड टेक्निकल पॉलिसी), सीबीडीटी