![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीसाठी सुमारे 15 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. वारी कालावधीपूर्वी व कालावधीनंतर भाविकांना चांगल्या सेवासुविधा मिळाव्यात म्हणून नगरपरिषद आपल्या स्तरावर योग्य ते प्रयत्न करत असत़े वारी कालावधीत शहरामध्ये मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होत असून, 100 ते 120 टनापर्यंत कचरा उचलला जात आहे.
मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करून आरोग्य विभागातील सर्व सफाई कर्मचाऱयांना अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार संपूर्ण शहर हे कचरामुक्त करण्याचे प्रयत्न नगरपरिषद करत आहे.
विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर, संतपेठ, स्टेशन रोड, जुनी पेठ, गोविंदपुरा, नवी पेठ, इसबावी, मनीषानगर, गणेशनगर, पालखीमार्ग व पालखीतळ या भागात सफाई करण्यात येत आहे. या विभागात रस्ता झाडणे, गटारी स्वच्छता, कचरा वाहतूक, शौचालय स्वच्छता इ. साठी 1500 सफाई कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच या यात्राकालावधीमध्ये सोलापूर महापालिका, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, कुर्डुवाडी या नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी येथे मदतीसाठी मागविले आहेत.
यात्रा कालावधीमध्ये दशमी व एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्ग तसेच प्रदक्षिणा मार्गाच्या आतील रस्ते, नदीपात्राकडे जाणारे सर्व रस्ते या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी किंवा इतर गाडय़ा जाऊ शकत नाहीत़ या भागांमध्ये द्वादशीला कचऱयाचे ढीग दिसू लागतात. हा पडलेला कचरा त्वरित उचलला जात आहे. शहर भाग, उपनगरे, पत्राशेड, दर्शनबारी रस्ता, नदी वाळवंट, 65 एकर परिसर, वाखरी पालखीतळ येथे स्वच्छता करण्यात येत आहे. यात्रा कालावधीमध्ये आरोग्य विभागाकडील आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, 10 वॉर्ड शिपाई, मुकादम, सफाई कामगार हे दिवस-रात्र काम करीत आहेत.
शहरात लवकरात लवकर स्वच्छता व्हावी व सर्व कचरा गोळा करून शहर लवकरात लवकर कचरामुक्त व्हावे म्हणून नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून, या कामी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, सर्व शिपाई, मुकदम, सफाई कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
कचरा उचलण्यासाठी व्यवस्था
शहरातील कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेच्या 2 डंपिंग ट्रॉल्या, 2 कॉम्पॅक्टर, 1 कंटेनर कॅरिअर अशी 5 वाहने तसेच जिह्यातील आलेल्या नगरपरिषदेचे 10 ट्रक्टर, जेसीबी, टिपर व डंपिंगद्वारे दररोज 100 ते 120 टन कचरा यात्रा कालावधीत उचलला जात आहे. तर घरातील कचरा गोळा करण्यासाठी 41 घंटागाडय़ांचा वापर करण्यात येत आहे. या घंटागाडय़ा सकाळी व संध्याकाळी कचरा गोळा करीत आहेत.