महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै ।राज्याच्या राजकीय वर्तुळात भुकंप घडवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ इतर आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी काल उपमुख्यमंत्रपदाची शपथ देखील घेतली, यादरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे.
या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या घटनेमध्ये बदल केले होते. सेनेत झालेल्या बंडानंतर पवारांकडून तातडीने खबरदारी घेण्यात आली होती असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान नोव्हेंबर २०२२ मध्ये केलेल्या या बदलांमध्ये पक्षासंदर्भातील सर्व महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रीय समितीला असून राज्य पातळीवरील नेते यासंदर्भातील निर्णय घेऊ शकत नाहीत असं कलम पक्षाच्या घटनेत जोडण्यात आले होतं. असे काही बदल करायचे असतील तर त्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय समितीची बैठक बोलवावी लागते आणि सर्व सदस्यांना एक महिना आधी नोटीस देणं देखील बंधनकारक करण्यात आलं होतं. यासंबंधीचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी घटना बदलली की नाही, याबद्दल ठोस माहिती सध्या उपलब्ध नाही, मात्र ८ जुलै २०२२ रोजी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत पक्षाच्या विघटीकरण किंवा विलनीकरणाबाबत काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.
८ जुलै २०२२ ला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर राष्ट्रवादी काँग्रेसची घटना अपडेट करण्यात आली असून या घटनेत पक्षातील महत्वपूर्ण बदलांसबंधी काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.
