महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै ।India vs West Indies 1st Team India Test Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना हा डॉमिनिका येथील विंडसोर पार्क येथे होणार आहे. भारताने या कसोटीसाठी संघात ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल या युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. निवडसमितीने चेतेश्वर पुजाराला संघात स्थान दिले नसल्याने तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
संघात निवड झालेले दोनही फलंदाज हे सलामीवीर आहेत. त्यातही डावखुरा असल्याने यशस्वी जैसवालला ऋतुराजच्या आधी कसोटी खेळण्याची संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या 2 दिवसांच्या सराव सामन्यात यशस्वी जैसवालने 76 चेंडूत 54 धावांची खेळी करून संघातील आपली दावेदारी प्रबळ केली.
विशेष म्हणजे सराव सामन्यात टॉप ऑर्डर फलंदाजांना 50 चेंडू खेळल्यानंतर रिटायर करण्यात आले. मात्र रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी यशस्वी जैसवालला पुढे खेळू दिलं. हीच गोष्ट जैसवाल पहिल्या कसोटी सामन्यात कसोटी पदार्पण करण्याच्या शक्यतेला बळ देत आहे.
शुभमन गिलबाबत काय?
वेस्ट इंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जर यशस्वी जैसवाल खेळला तर मग भारताची सलामी जोडी कशी असेल हा प्रश्न आहेच. अशा परिस्थितीत शुभमन गिलची बॅटिंग ऑर्डर बदलली जाऊ शकते. त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते. याचबरोबर त्याला चौथ्या आणि पाचव्या स्थानावर देखील आजमावून पाहिले जाईल.
शुभमन गिलला चेतेश्वर पुजाराचा वारसदार म्हणून तयार करण्याचा देखील संघ व्यवस्थापनाचा प्लॅन आहे. त्यामुळे भारताच्या कसोटी संघाच्या सलामी जोडीत बदल होऊ शकतो. यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा डावाची सुरूवात करू शकतात.