महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. शनिवारी १५ जून रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या आठ महिन्यांपासून रवींद्र महाजनी हे तिथे एकटेच राहत असल्याची माहिती समोर आली. तसेच त्यांचा मृतदेह सापडण्याच्या तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असं पोलिसांनी सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोल करण्यात आलं. आता त्याने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
गश्मीर महाजनीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वडिलांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच त्याने तो इतके दिवस शांत का होता, याबद्दलही सांगितले आहे.
गश्मीर महाजनीची पोस्ट
“अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो.
आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेनच.”, अशी पोस्ट गश्मीर महाजनीने केली आहे.