महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । पावसाळा म्हटलं की पर्यटकांच्या नजरा उंचीवरून पाण्याचा अफाट लोट घेऊन कोसळणाऱ्या धबधब्यांकडे वळतात. महाराष्ट्राप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील काही धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहेत. असाच एक धबधबा म्हणजे रंधा धबधबा होय. सध्या पावसामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून त्यामुळे रंधा धबधबा ओसंडून वाहत आहे. अनेक पर्यटक हे मनोहरी दृश्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
रंधा धबधबा पर्यटकांचं आकर्षण स्थळ
आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या थंडगार सरी, उंचीवरून कोसळणारे पाण्याचे लोट आणि परिसरातील उंचच उंच पर्वत या गोष्टी नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय राहिलेल्या आहेत. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. पाण्याचा विसर्ग मुळा नदीपात्रात होत असल्याने मुळा नदीवर असलेला रंधा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटकांसाठी पर्यटनाची मेजवानी असणारा हा परिसर सध्या सर्वांनाच भुरळ घालत आहे.
कुठं आहे रंधा धबधबा?
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरापासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर रंधा धबधबा आहे. तर भंडारदरा आणि राजूर गावापासून 10 किलोमीटरवर रंधा या गावात हा विशाल धबधबा आहे. तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजूने अजून एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.
फेसाळणाऱ्या धबधब्याचं दृश्य
सध्या मोठा धबधबा सुरु झाला असून त्याच्या शेजारी दक्षिण दिशेला असलेल्या कातलापूर ओढ्यावरील धबधबा अवतीर्ण झाला आहे. चार ठिकाणी काळ्या कातळावरून थांबत उड्या मारत तो 50 फुट खोल दरीत झेपावताना मनात धस्स होते. पर्यटक त्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी जवळ जवळ सरकतात. तर फोटोग्राफर झूम करत तो धबधबा आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करतात.
पर्यटनासाठी सोयी
या धबधब्याकडे जाण्यासाठी उत्तम रस्ता, पर्यटकांना जेवण करण्यासाठी राजुर, अकोले, शेंडी आणि भंडारदरा या ठिकाणी होटेल्स आहेत. परिसरातील एक वरचढ एक असणारे विविध पर्यटन स्थळांमुळे सध्या निसर्गप्रेमींचा ओढ या धबधब्याकडे वाढली आहे. येथील निसर्गाचे वैभव निश्चितच सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडनारं आहे.