महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । केंद्र सरकारनं कांदा निर्याती संदर्भात घेतलेल्या शुल्क वाढीच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करत निषेध व्यक्त केला. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर तोडगा काढला जावा यासाठी आज राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारनं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या खरेदीसाठी नाशिक आणि नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सरकारच्या निर्णयावर टिका केली आहे. केंद्र सरकारचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारनं प्रति क्विंटल दिलेला 2410 भाव कमी आहे. कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये इतका भाव द्यावा ही मागणी असल्याचं शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च 2400 रुपयात निघणार नाही. हा कांदा टिकणारा आहे, त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहे. निर्यात शुल्क कमी करावं अशी मागणी देखील शरद पवारांनी केली आहे.