महागाईबाबत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सतर्क राहावे ; अर्थ मंत्रालयाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । येत्या काही महिन्यांत देशात महागाई वाढण्याचा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे. याचे कारण जागतिक आणि प्रादेशिक अस्थिरतेव्यतिरिक्त देशांतर्गत अडचणी कारणीभूत आहेत. जुलैच्या मासिक आर्थिक आढाव्यात आर्थिक व्यवहार विभागाने याबाबत सरकारसह रिझर्व्ह बँकेने सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. टोमॅटोच्या किमतीतील वाढीबाबत मंत्रालयाने म्हटले की ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला टोमॅटोचे पीक आल्यावर भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. तूर डाळ आयात केल्याने डाळींचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. खरे तर, चिंतेचे कारण म्हणजे जूनमध्ये असलेला चलनवाढीचा दर ४.९% वरून जुलैमध्ये ७.४% झाला. हे रिझर्व्ह बँकेच्या ६% मर्यादेपेक्षा जास्त आहे. टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या किमतीत झालेली वाढ हे महागाई दरात नव्याने वाढ होण्याचे कारण मानले जात आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे दर १५० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे भाज्यांची महागाई ३७ टक्क्यांवर पोहोचली आहे.

निर्यात शुल्क लादल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कमी भाव मिळण्याची चिंता करू नये, असे आवाहन ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. शासन २४१० रु. प्रति क्विंटल आधारभूत दराने कांदा खरेदी करणार आहे. ही ऐतिहासिक किंमत असून निर्यातीतून मिळणाऱ्या सरासरी रु. १८००-१९०० प्रति क्विंटल पेक्षा जास्त आहे. गोयल म्हणाले की, सरकार दोन लाख टन अतिरिक्त कांदा खरेदी करणार आहे. बफर स्टॉक देखील वाढेल.

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी म्हटले आहे की टोमॅटो आणि कांद्याच्या किमतीत प्रत्येक १०% वाढीमागे ग्राहक किंमत निर्देशांक ०.१२% वाढतो. रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलनविषयक धोरणावर परिणाम करणाऱ्या महागाई दरावर कांद्याच्या किमतीचा जास्त परिणाम होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *