Lok Sabha Election 2024: शिंदे, दादांची घसरगुंडी, मविआची मुसंडी; कोणाला किती जागा? बड्या गुंतवणूकदारानं अंदाज सांगितला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। मुंबई: लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे झाले आहेत. आता मतदानाचा केवळ शेवटचा टप्पा शिल्लक आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. गेल्या ५ वर्षांमध्ये राज्यात घडलेल्या घडामोडी पाहता यंदाची निवडणूक अभूतपूर्व ठरली. निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होईल. तत्पूर्वी अनेकांनी आपापला अंदाज बांधण्यास आणि तो जाहीरपणे मांडण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या २ दशकांपासून निवडणुकीतील ट्रेंड्सचा अभ्यास करणारे गुंतवणूकदार रुचिर शर्मांनी राज्यातील निकालाबद्दलचा त्यांचा अंदाज मांडला. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान यश मिळेल. सत्ताधारी, विरोधकांना ५०-५० टक्के जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला. भाजपप्रणित एनडीएच्या जागा कमी होतील. पण त्यात खरं नुकसान भाजपच्या मित्रपक्षांचं म्हणजेच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल, असं भाकित रुचिर शर्मांनी वर्तवलं.

मी निवडणुकीच्या कालावधीत केलेल्या प्रवासातून काही गोष्टी लक्षात आल्या. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांना ५०-५० टक्के जागा मिळू शकतात. खरं नुकसान भाजपच्या मित्रपक्षांचं होईल असा माझा अंदाज आहे, असं शर्मा म्हणाले. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. भाजपप्रणित एनडीएनं गेल्या निवडणुकीत ४१ जागा जिंकल्या होत्या. आता शर्मांचा अंदाज खरा ठरल्यास एनडीएचं राज्यात १७ जागांचं नुकसान होईल.

राज्यात भाजपची एकनाथ शिंदेंच्या शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती होती. राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फुटले. त्यांची शकलं झाली. एक गट सत्तेत, दुसरा विरोधात अशी अवस्था होती. याबद्दल शर्मांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. ‘कोण कोणा सोबत आहे हेच कळत नाही अशी अवस्था राज्यात दिसली. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती पाहायला मिळाली,’ असं शर्मा म्हणाले.
ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून टीका, सुषमा अंधारेंचं एकनाथ शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर

रुचिर शर्मांनी भाजपच्या मित्रपक्षांच्या कामगिरीबद्दल महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. ‘आंध्र प्रदेशचा अपवाद वगळता बिहार, कर्नाटक, महाराष्ट्रात भाजपच्या मित्रपक्षांची कामगिरी निराशाजनक असेल. भाजपचे मित्रपक्ष संकटात आहेत. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाची कामगिरी चांगली असेल. पण अन्य राज्यात भाजपच्या मित्रपक्षांना फटका बसेल,’ असा अंदाज शर्मांनी वर्तवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *