महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळांची वेळ आता सकाळी नऊ असणार आहे. दरम्यान, १५ जूनला शाळेची पहिली घंटा वाजेल, पण लगेचच शाळांना दोन दिवस सुटी असणार आहे. रविवारी सुटी असेल तर सोमवारी (ता. १७) बकरी ईदनिमित्त सार्वजनिक सुटी आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी एलकेजी, यूकेजी वर्गापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचे धोरण सरकार पातळीवर विचाराधीन आहे. परंतु, त्यासंबंधीचा निर्णय अजून झालेला नाही. अशा परिस्थितीत ‘आरटीई’ प्रवेशाच्या निकषात बदल करून जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढीचा प्रयत्न झाला, पण या बदलाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने ‘आरटीई’चे प्रवेश पूर्वीप्रमाणेच राबविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता शिक्षकांनाच गुणवत्ता वाढीसाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मिठाई वाटून, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे विशेषतः: पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर लगेच दोन दिवस विद्यार्थ्यांना सुटी असेल. मंगळवारपासून (ता. १८) पुन्हा नियमित शाळा सुरू होतील.
‘आरटीई’ची शुक्रवारी ऑनलाइन लॉटरी
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत (लॉटरी) शुक्रवारी (ता. ७) सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण व्हीसीद्वारे करण्यात येणार आहे.
