![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुन ।। देशातील वातावरणात मोठा बदल झाला असून सध्या ७ ठिकाणी वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गोवा किनारपट्टीवरील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील ५ ते ६ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह पुण्याला रविवारपासून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामाना खात्याने शुक्रवारी मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा दिला होता. मात्र, पाऊस तर सोडाच पण मुंबईकरांना असह्य उकाड्याला सामोरे जावे लागले. तापमानाचा पारा वाढल्याने मुंबईकर हैराण झाले होते. दरम्यान, येत्या रविवारपासून मुंबईसह पुण्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सून हा तळकोकणात पोहचला असून सातारा सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे शहराला देखील पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. येत्या २४ तासांत मौसमी वारे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
#हवामानअंदाज
आज व उद्या दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.#WeatherUpdate pic.twitter.com/g06Mlp0VtB— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 7, 2024
त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुबार, या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि परभणीतही पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागरपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सध्या राज्यभरात पाऊस कोसळत असला तरी, हा पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे जमिनीत ६ इंच ओलावा जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.