धनुष्यबाणाला हात लावलेला लोकांना आवडलं नाही, राज ठाकरे स्पष्टच बोलले; ‘बाळासाहेबांना कमी लेखू नका’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लगावला आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही. मी याबाबत अमित शाह यांना कल्पना दिली होती असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी ही विधानं केली आहेत. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेबांची ओळख आहे. बाळासाहेबांना कमी लेखू नका. शिवसेना, धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही. अमित शाह यांना मी याबाबत कल्पना दिली होती असा खुलासा राज ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्यात केला. तसंच राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही. मोदी नको म्हणून काहींनी महाविकास आघाडीला मत दिलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

“विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी आहे. राज्यात स्वबळावर 225 ते 250 जागा लढणार,” असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. जुलै महिन्यात राज्याचा दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *