महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर | यंदाचा मान्सूनचा हंगाम जवळपास पूर्णत: संपला असून आता काही ठिकाणी थंडी तर काही भागात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. मात्र, जाता जाता अनेक भागात पावसाच्या सरी बसरत आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
सोमवारी देशातील काही राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीरला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. आता हवामान खात्याने पुढील २४ तासांतही या भागात पुन्हा मुसळधार पाऊस होईल, असा इशारा दिला आहे.
येत्या 48 तासांत मान्सून माघारी परतणार
हवामान खात्याने (Weather Updates) दिलेल्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेचा पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रातील काही भागांमधून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत मान्सून माघारी परतणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून मान्सून पूर्णपणे बाहेर पडला आहे. तसे पाहता यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी बसरला. सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला.