महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर ऑक्टोबर हिटपासून अखेर पहाटेच्या वेळी काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये बुधवारी रात्री काहीसा गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातही किमान तापमान खाली उतरल्याची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या ऋतुप्रमाणे ११ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान खाली उतरले आहे. मात्र हा दिलासा दोन-तीन दिवसच मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. थंडीचा ऋतु सुरू होण्यास आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी राज्यातील वातावरण बदलले आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे गुरुवारी सकाळी २२.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान बुधवारपेक्षा एका अंशाने कमी होते. गेले काही दिवस आर्द्रतेमुळे सातत्याने किमान तापमानही चढे असताना गुरुवारी सकाळी किंचित गारव्याची जाणीव मुंबईकरांना झाली. कुलाबा येथे मात्र २५.८ अंश सेल्सिअस किमान तापमान होते.
सध्या आभाळ निरभ्र आहे. त्यामुळे सूर्यकिरणे थेट जमिनीवर पोहोचत आहेत. परिणामी कमाल तापमानात झालेली वाढ कायम आहे. याचेच चित्र गुरुवारी कमाल तापमानात उमटले होते. कुलाबा येथे ३५.५, तर सांताक्रूझ येथे ३६.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. किमान तापमानातील घट आणखी २४ ते ४८ तास अनुभवता येऊ शकते, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी वर्तवला. मात्र ही थंडीची चाहूल म्हणता येणार नाही. आणखी १० दिवसांनी तापमानामुळे जाणवणारी अस्वस्थता कमी होऊ शकते. थंडीसाठी मुंबईकरांना डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.
कोकण विभागात किमान तापमान २० अंशांच्या वर होते. मात्र राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या खाली आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे ११ अंश, नाशिक येथे १५.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता अधिक होती. त्यामुळे तिथे लोकांना थंडीचीही जाणीव झाली.
जळगावमध्ये सरासरीपेक्षा ६.१ अंशांनी तापमान कमी झाल्याची नोंद गुरुवारी झाली. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर येथे १५, बीड येथे १६.५, परभणी येथे १६.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. विदर्भातही वाशिम येथे १५.४, वर्धा येथे १६.८, अमरावती येथे १६.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.