महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। मावळ तालुक्यातील नागरिकांसह पिंपरी-चिंचवड शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण ९१ टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून १८०० आणि जलविद्युत निर्मिती केंद्राद्वारे १४०० असे एकूण ३२०० क्युसेक्सने विसर्ग करण्यात येणार.
पवना धरणात पाण्याची आवक अद्यापही जोरदार सुरू असल्याने पवना धरण जलाशयातून आज (ता.१) दुपारी १ वाजता विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. याबद्दल पवना धरण विभागाकडून नागरिकांसाठी सुचान देण्यात आली असून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, पवना धरण सद्यस्थितीत ९१ टक्के भरलेले आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे.
पाणी पातळीत आणि धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी १ वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून १८०० क्युसेक इतक्या क्षमतेने तर जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४०० क्युसेक इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून एकुण ३२०० क्युसेक इतक्या क्षमतेने नदी पात्रामध्ये विसर्ग होणार आहे.
पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येईल. तरी पवना नदी काठच्या नागरिकांनी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.