महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। देशासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जोरदार पाऊस होईल, असंही आयएमडीने सांगितलं आहे. आजपासून पुढील 10 दिवस देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचा जोर आणखीच वाढणार आहे.परंतु, द्वीपकल्पीय भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर पाऊस कमी होऊ शकतो. अल निनोचा प्रभाव संपल्याने आता ला लिनाचा प्रभाव जाणवू लागलाय. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आज कुठे कुठे कोसणार पाऊस?
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज शनिवारी कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात विजांसह कडकडासह जोरदार पाऊस होऊ शकतो. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
तर पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दुसरीकडे मुंबईसह पालघर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदियासह आसपासच्या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजी, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनुसार, सध्या अरबी समुद्रात सौराष्ट्रालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. दुसरीकडे ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला ला निना पॅटर्न विकसित झाल्यामुळे भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. IMD ने म्हटले आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतात सरासरी 422.8 मिमीपेक्षा 106 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.