महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (३ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासी बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसंच, यशश्री शिंदेचे हत्याप्रकरणही या चर्चेत आले. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
२५ जुलै यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. विवाहाला नकार दिला म्हणून दाऊद शेख या तरुणाने तिची गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह तिथंच ठेवून तो पसार झाला. तिच्या मृतदेहाचे श्वानांनी लचके तोडले. दोन दिवसांनी तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. ही घटना उजेडात येताच महाराष्ट्रभर खळबळ माजली. या घटनेचा तपास फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी खुद्द तिच्या आई-वडिलांनीही केली आहे. आता मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीतही या हत्या प्रकरणाची चर्चा झाली आहे. (Raj Thackeray On Yashashree Shinde Murder Case)
उरण येथील यशश्री शिंदे हिचं झालेलं निर्घृण हत्याकांड, तसंच शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे हिच्या झालेल्या हत्याकांडाबद्दल मनसे नेते अविनाश अभ्यंकर आणि आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त करत आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच शक्ती कायदा जरी राज्यातील दोन्ही सभागृहाने मान्य करून त्याचा मसुदा केंद्राकडे पाठवला असला तरी त्यातील काही तरतुदींवर केंद्राचे आक्षेप आहेत, त्यामुळे या कायद्याला केंद्राकडून मंजुरी मिळत नाहीये, यावर राज्य शासनाने केंद्रसरकारकडे पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी अविनाश अभ्यंकर यांनी केली. (Raj Thackeray On Yashashree Shinde Murder Case)