महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे- ता. १९ – : कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं, असं अजिबात नाही. यातील बहुतांश रुग्ण खडखडीत बरे होतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. कोणतीही लक्षणे नसतानाही कोरोना संसर्गाचे निदान झाले असल्यास तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी धडपड करू नका, सौम्य लक्षणांच्या रुग्णांनी हॉस्पिटलमध्येच उपचारांसाठी दाखल होण्याचा अट्टहास करू नये. अत्यंत सौम्य लक्षणांच्या कोरोनाबाधितांना घरच्या घरी व्यवस्थित उपचार देता येतो. असा सल्ला अलोहा लाइफस्टाइल रिव्हर्सल स्टिड्यूओचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी दिला आहे.
पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे; पण यातील ८० ते ९० टक्के रुग्णांना सामान्य फ्लू, सर्दी अशी अत्यंत सौम्य लक्षणे दिसतात. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सध्या कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे निदान प्रयोगशाळेतून झाल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातेवाइकांची धावाधाव होत असल्याचे चित्र सध्या पुण्यात दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये जागा करून देण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे फोन दररोज येत आहेत; पण रुग्णाला दाखल करण्याचा निर्णय वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्या. केवळ कोरोना निदान झाले हे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं कारण होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घरातच विलगीकरण झालेल्या रुग्णांनी पल्स ऑक्सिमीटर उपकरण घ्यावे. दर दोन ते तीन तासांनी बोटांना लावून आपल्या रक्तातील प्राणवायूचे (ऑक्सिजन) प्रमाण त्यातून बघता येईल. सर्दी, खोकला, थोडासा ताप अशी कोरोनाची लक्षणे असतील आणि त्याच वेळी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ ते ९५ पेक्षा जास्त असेल, तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची अजिबात गरज नाही.
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ पेक्षा कमी होऊ लागले. औषधे घेऊनही रुग्णाचा त्रास वाढायला लागला, तरच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची खरंच गरज आहे का, या बाबत डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.
– डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोग तज्ज्ञ