महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। ठोंबरे-आंदेकर टोळीतील वर्चस्ववाद आणि ठोंबरे टोळीतील निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच वनराज आंदेकरचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत. कौटुंबिक आणि संपत्तीचा वाद ही तत्कालिक कारणे असून, सोमनाथ गायकवाड याने आंदेकरच्या खुनाचा कट रचल्याचा संशय आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके फरार आरोपींच्या मागावर असून, सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे.
माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करून आणि गोळ्या झाडून रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खून करण्यात आला. या प्रकरणी बंडू आंदेकरने दिलेल्या तक्रारीवरून दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये संपत्तीच्या वादातून वनराजच्या बहिणी आणि त्यांच्या नवऱ्यांनी खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना हा प्रकार टोळीयुद्धात घडल्याची दाट शंका येत आहे.
पाच जणांना अटक; दहा फरारी
पोलिसांनी या प्रकरणी संजिवनी जयंत कोमकर, जयंत लक्ष्मण कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, प्रकाश कोमकर, अनिकेत दुधभाते, तुषार कदम, सागर पवार, पवन करताल, सॅम काळे यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जयंत, गणेश व प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजिवनी जयंत कोमकर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, प्रथमदर्शी १५ आरोपी निष्पन्न झाले असले तरीही यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदेकर-ठोंबरे टोळीतील संघर्ष
आंदेकर टोळीने निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते यांच्यावर ऑक्टोबर २०२३मध्ये हल्ला केला होता. त्यात आखाडेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. दुधभाते जखमी झाला होता. जखमी दुधभाते आणि आखाडेचा भाऊ सागर पवार या दोघांचाही हल्लेखोरांमध्ये समावेश आहे, अशी पोलिसांची माहिती आहे. सूरज ठोंबरे टोळीवर ‘मकोका’ कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सोमनाथ गायकवाडची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. गायकवाड दोन ते अडीच महिन्यांपूर्वी जामीनावर बाहेर आला. त्याला बाहेर काढण्यासाठी सॅम काळे याने विशेष प्रयत्न केल्याची पोलिसांनी माहिती आहे.