महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा आठ वाजता भरण्याची शक्यता आहे. मात्र पालकवर्गाने नऊची वेळ बदलण्यास विरोध केला आहे. राज्यपालांच्या सुचनेनुसार काही महिन्यांपूर्वी शाळेची वेळ बदलत ९ वाजता केली होती. मात्र आता पुन्हा त्यात बदल होण्याच्या हालचाली आहेत. पाहूया एक रिपोर्ट.
राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला शाळांनी योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे या धोरणात लवकरच बदल केला जाणार आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 ऐवजी 8 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे 9ची वेळ विद्यार्थ्यांसाठी सोयीची आहे. कारण त्यांची रात्री पूर्ण वेळ झोप होते. तसेच नोकरी करणारे पालकही सकाळची कामं पूर्ण करून, मुलांसाठी डबा, नाष्टा देऊन त्यांना शाळेत सोडू शकतात, असं पालकांचं म्हणणं आहे.
मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी तत्कालीन राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आला होता. राज्यातील पालक, शिक्षक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केले होतं. मात्र काही मोजक्या संस्थाचालकांनी विरोध दर्शवत सरकारचा निर्णय़ धुडकावून लावला होता. त्यामुळे आता बॅकफूटवर गेलेल्या शालेय शिक्षण विभागाने आठ वाजताची मध्यममार्गी भूमिका घेतली असल्याची माहिती आहे. सकाळी लवकर शाळा का नको? याची कारणे पाहूयात.
अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या झोपण्याच्या वेळा बदलल्या आहेत. अनेक मुले उशिरापर्यंत जागे असतात. तरीही त्यांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागते. यामुळे मुलांची झोप अपुरी पडते. हिवाळा आणि पावसाळ्यात सकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते आजारी पडतात. सकाळी मुलांसाठी जेवणाचा डबा तयार करणे आणि वेळेत शाळेत सोडणे, यामुळे अनेक पालकांची ओढाताण होते.
मात्र आता पालकांची सोयीची ९ ची वेळ टाळून शिक्षण विभाग मध्यममार्ग काढणार का याची उत्सुकता आहे. आठ काय किंवा नऊ काय. विद्यार्थी शाळेत येतीलच. मात्र शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड नको एव्हढीच अपेक्षा व्यक्त होत आहे.