महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ ऑक्टोबर ।। आगामी विधानसभा निवडणुकीच्या राज्यातील प्रमुख पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच धडपड सुरु आहे. सरकारने लाडकी बहीण योजना सुरु करुन मोठा डाव टाकला असला तरी आता महायुतीमधील तीन पक्षांमध्ये या योजनेचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरु आहे. त्यासाठी विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अजितदादा गटाकडूनही लाडक्या बहीण योजनेचा (CM Ladki Bahin Yojana) फायदा आपल्या पक्षाला मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी अजितदादा गटाने अलीकडेच एक विशेष मोहीम राबवली होती. या मोहीमेला राज्यातील महिला मतदार आणि शेतकरी वर्गाचा तुफान प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रवादी हेल्पलाइन नंबरला राज्यातून तुफान प्रतिसाद मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत या टोल फ्री नंबरवर तब्बल 15 लाख 8 हजार 827 फोन आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्यावतीने तक्रारी आलेल्या 13 लाख 57 हजार 942 नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात आल्या. यापैकी सगळ्यात जास्त फोन हे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अडचणी सांगणारे होते.
कोणत्या कारणासाठी फोन आले?
* लाडकी बहीण योजनेतील अडचणी संदर्भात 8 लाख 50 हजार 90 फोन आले यातील 7 लाख 65 हजार 81 नागरिकांच्या अडचणी सोडवल्या
* शेतकऱ्यांच्या अडचणीत संदर्भात 1 लाख 44 हजार 788 फोन आले यातील 1 लाख 30 हजार 309 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या
* अन्नपूर्ण योजने संदर्भात 2,36,127 फोन आले. यापैकी 2 लाख 12 हजार 514 नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात आल्या
* युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1 लाख 34 हजार 180 फोन आले यातील 1 लाख 20 हजार 762 युवकांचे प्रश्न सोडवण्यात आले
* मोफत शिक्षण योजनेसाठी 1 लाख 26 हजार 34 फोन आले. यातील 1 लाख 13 हजार 430 विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात आले
* बळीराजा मोफत वीज बिल योजना अंतर्गत एकूण 9 हजार 954 फोन आले यातील 8 हजार 958 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या
* इतर कारणास्तव 7 हजार 654 होणारे त्यातील 6 हजार 888 लोकांचे प्रश्न सोडवण्यात आले