![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑक्टोबर ।। मान्सूनने परतीचा प्रवास पुन्हा सुरु केल्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आज मंगळवारी (ता. ८) दक्षिणेकडील जिल्ह्यात तसेच विदर्भात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने म्हटलं आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच परतीच्या पावसाची चाल थबकली.
12.40 night, Possibility of light to mod rain Mumbai Thane Raigad during next 2,3 hrs. pic.twitter.com/Kc8GcVLEPi
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2024
त्यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३५ अंशाच्या पार गेल्याने प्रचंड उकाडा जाणवू लागला. आता पुन्हा एकदा मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले असून पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे.
हवामान खात्याने आजपासून काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील सिंधुदुर्गासह काही जिल्ह्यात मंगळवारी पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. दुसरीकडे नंदुरबार, धुळे, जळगावसह खान्देशातील जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असल्याचं आयएमडीने स्पष्ट केलं आहे.![]()
