शाळा आता नऊनंतरच; निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १० फेब्रुवारी ।। राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे वर्ग सकाळी नऊ वाजल्यानंतर भरवले जावेत, यासाठीचा अध्यादेश गुरुवारी (दि.8) जाहीर झाला. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी आता शाळांना करावीच लागणार आहे. या निर्णयामुळे पालकांसह शिक्षक, रिक्षाचालक, व्हॅनचालक यांना दिलासा मिळाला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी राजभवनातील एका कार्यक्रमात भाषणावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना केली होती. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन वेळ बदलण्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे.

शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार सकाळी नऊपूर्वी भरणार्‍या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी 9 किंवा 9 नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजण्याच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *