महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 (IMC 2024) चे उद्घाटन केले. यावेळी या कार्यक्रमाची थीम ‘The Future is Now’ आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर करण्यात आले असून हा १८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतातील दूरसंचार क्रांतीच्या क्षेत्रात अलीकडच्या काळात झालेली प्रगती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
गेल्या दहा वर्षांत भारतात मोबाईल आणि इंटरनेटच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. 5G ने एक परिवर्तन दिले आहे. आम्ही लवकरच 6G वर देखील काम करणार आहोत. 21व्या शतकात भारताचा मोबाईल आणि टेलिकॉम प्रवास संपूर्ण जगासाठी विशेष आवडीचा विषय बनला आहे. सध्याच्या काळात भारतात 120 कोटी मोबाइल युजर्स आणि 95 कोटी इंटरनेट युजर्स आहेत. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही देशाची महत्त्वाची कामगिरी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, आज भारतात दूरसंचार क्षेत्रात झालेली प्रगती अकल्पनीय आहे. आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. सँडर्ड आणि सर्व्हिस यांचा संगम आहे. आयटीयू आणि इंडिया मोबाईल काँग्रेसचे एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि एक क्रांतिकारी उपक्रमही आहे. भारताने हजारो वर्षांपासून वसुधैव कटुंबकमचा संदेश दिला आहे. संवाद साधणे हे आजच्या भारताचे ध्येय आहे. भारत जगात प्रगतीचा मार्ग मोकळा करत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
लोकल आणि ग्लोबल यांचे संयोजन
पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा लोकल आणि ग्लोबल एकत्र येते, तेव्हा जगाला नवे लाभ मिळतात. टेलिकॉम आणि कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात भारताचे मॉडेल काहीसे वेगळे आहे. भारतात आम्ही दूरसंचार हे केवळ कनेक्टिव्हिटीचे माध्यम नाही तर समानता आणि संधीचे माध्यम बनवले आहे. आज हे माध्यम गाव आणि शहर, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यात मदत करत आहे. गेल्या दहा वर्षांत डिजिटल इंडिया मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
सिल्क रूट ते टेक्नोलॉजी रूट
आजचा भारत जगाला वादातून बाहेर काढण्यात आणि संपर्कात आणण्यात गुंतला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, प्राचीन सिल्क रूटपासून ते आजच्या टेक्नोलॉजी रूटपर्यंत जगाशी संपर्क साधणे आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडणे हे एकच भारताचे ध्येय राहिले आहे. या संदर्भात WTSA आणि IMC यांच्यातील आजची भागीदारी प्रेरणेचा मार्ग दाखवणारा आहे. स्टँडर्ड आणि सर्व्हिस एका व्यासपीठावर आणण्यासाठी आजचा कार्यक्रम खूप खास आहे. आज भारत क्वालिटी सर्व्हिसकडे अधिक लक्ष देत आहे. आम्ही स्टँडर्ड वर विशेष भर दिला आहे. अशा परिस्थितीत WTSA चा अनुभव भारताला नवी ऊर्जा देणारा ठरेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.