महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ मार्च ।। गुगलने तब्बल 200 भारतीय अॅप प्ले स्टोअरमधून काढून टाकल्याचे समोर आले आहे. शुल्क वसुलीच्या धोरणाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. मात्र ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत व्होडाफोन, एअरटेल, रिलायन्स जिओ हे सदस्य असलेल्या द सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने अॅप्सना पाठिंबा दिला आहे. तसेच अॅप कंपन्यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला असून गुगल आणि भारतीय अॅप्समध्ये संघर्ष वाढला आहे.
शादी डॉट कॉम, नोकरी डॉट कॉम, बालाजी टेलीफिल्म्स, कुकू एफएम, क्वॅक क्वॅक डेटिंग सर्व्हीस अॅप, टली मेडली अशी अनेक अॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आली आहेत.
हटवलेली अॅप पुन्हा सुरू करण्यासाठी मोदी सरकारने विविध अॅप कंपन्या आणि गुगलच्या अधिकाऱयांमध्ये सोमवारी बैठका घेतल्या. बैठकीत शुल्क आकारणीसह विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गुगलने हटवलेली अॅप्स पुन्हा प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सरकारने केला.