Team India Squad T20 WC 2024 : टीम इंडियाला मिळाला रोहितचा पार्टनर!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ एप्रिल ।। Team India Squad T20 World Cup 2024 Yashasvi Jaiswal : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड येत्या काही दिवसांत होणार आहे. आणि योग्य वेळी यशस्वी जयस्वालने शानदार शतकी खेळी करून आपली दावेदारी सिद्ध केली. या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अपयशी ठरत असलेल्या जयस्वालने मुंबईविरुद्धच्या सामन्यात ६० चेंडूत नाबाद १०४ धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने 7 षटकार 9 चौकार मारले.

आयपीएल अगोदर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन द्विशतके करत कमालीचा फॉर्म दाखवणारा जयस्वाल आयपीएलमध्ये प्रभाव पाडू शकला नव्हता. त्यामुळे टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता मावळत चालली होती, ऐन मोक्याच्या क्षणी त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मासमोर शतक करून त्याचीही वाहवा मिळवली.

जयस्वालने फारच जबाबदारीपूर्वक आणि परिपक्व असा खेळ केला. त्याचा प्रत्येक फटका क्रिकेटच्या मूलभूत तंत्राला धरून होता. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहाणे आनंददायी होते, अशा शब्दात विख्यात माजी विक्रमी फलंदाज ब्रायन लाराने जयस्वालचा गौरव केला.

जयस्वालला अपेक्षित असलेला फॉर्म सापडला आहे, आता त्याने चिंता करण्याचे कारण नाही. याच आत्मविश्वासाने पुढच्या सामन्यातही खेळ करावा, असा सल्ला लाराने दिला आहे.

लारा पुढे म्हणतो, जेव्हा तुम्ही गोलंदाजांवर वर्चस्व मिळवता तेव्हा धावांची पुरेपूर वसुली करायची असते, हाच जयस्वालने मुंबई इंडियन्सनच्या गोलंदाजांविरुद्ध केले, म्हणून मला त्याची फलंदाजी पाहायला आवडते. विशेष म्हणजे, त्याच्या फलंदाजीत जबाबदारीचा विचार होता आणि परिपक्वतेचाही संगम होता.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवडताना आयपीएलच्या कामगिरीला प्राधान्य देण्यात येणार नसले तरी आम्ही खेळाडूंच्या फॉर्मवर लक्ष ठेवणार आहोत, असे निवड समितीकडून संकेत देण्यात आलेले आहेत. जयस्वालने राजस्थानच्या सातपैकी काही सामन्यांतून चांगली सुरुवात केली होती; परंतु मोठी खेळी त्याला करता आली नव्हती. त्याची क्षमता मोठी असल्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला होता आणि प्रत्येक सामन्यात त्याला संधी दिली.

आठपैकी सात सामन्यांत विजय मिळवून १४ गुणांची कमाई करणारा राजस्थानचा संघ प्लेऑफच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. प्लेऑफमधील त्यांचे स्थान बहुतेक निश्चित असणार आहे, त्यामुळे जयस्वाल आता मिळालेल्या फॉर्ममध्ये सातत्य कसे राखतो, याकडेही निवड समितीचे लक्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *