महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. १० ऑगस्ट – कोरोना महामारीमुळे डोक्याला हात लावून बसलेल्या बळीराजावर रविवारी केंद्र सरकारने निधीच्या रुपात आनंदाची बरसात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका क्लिकवर किसान सन्मान योजनेंतर्गत देशातील साडेआठ कोटी शेतकऱयांच्या खात्यात थेट 17 हजार 100 कोटी रुपये जमा केले. याचवेळी 1 लाख कोटींचा विशेष निधीही लॉन्च केला. हा निधी केंद्राच्या 20 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा भाग आहे.
पंतप्रधानांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ’ऍग्रीकल्चर इंप्रास्ट्रक्चर फंड’ अंतर्गत विविध आर्थिक योजनांची घोषणा केली. या कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते. याचवेळी किसान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे शेतकऱयांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले. देशाच्या विविध राज्यांतील शेतकरी, सामान्य नागरिक तसेच सहकार क्षेत्राशी संबंधित व्यक्ती या कार्यक्रमात ऑनलाईन जोडले गेले होते. पंतप्रधान मोदी यांनी भगवान बलराम जयंतीचे औचित्य साधून शेतकऱयांना विशेष निधी आणि विविध योजनांची खूशखबर दिली.
गावागावात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार
कृषी विकासाच्या विशेष निधीमुळे गावागावात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. मागील दीड वर्षात किसान सन्मान योजनेंतर्गत 75 हजार कोटी रुपये थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा झाले आहेत. यातील 22 हजार कोटी रुपये लॉकडाऊनच्या काळात ट्रान्स्फर केले, असे त्यांनी नमूद केले.
घोषणांचा वर्षाव
गावात शेतकऱयांच्या गटाला, किसान समित्यांना, एफपीओला गोदाम बनवण्यासाठी तसेच कोल्ड स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंगसंबंधी उद्योगांसाठी कर्जाच्या रुपात मदत केली जाईल.
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रत्येक जिह्यात प्रसिद्ध असलेल्या उत्पादनांना देश आणि विदेशातील मार्केटपर्यंत पोहोचकण्यासाठी मोठी योजना कार्यान्वित राहील.
महाराष्ट्र आणि बिहारदरम्यान किसान रेल्वे सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱयांना भाजीपाला लागवड, पशुपालन तसेच मत्स्यपालनसाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जाईल.