महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। महायुतीने ईव्हीएममध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत होता. दरम्यान, आता मविआ नेत्यांनी दावा केला आहे की सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मतदान केंद्र ताब्यात घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. बीडमधील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणावरून आव्हाडांसह अनेक विरोधक थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत असतानाच आता त्यांच्या निवडणूक विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार आव्हाड यांनी एक्सवरील एक पोस्ट (व्हिडीओ) रिपोस्ट केली आहे. यामध्ये एक व्यक्ती ईव्हीएम मशीनवर धनंजय मुंडे यांना मतदान करत असल्याचं दिसतंय. मतदान केंद्र ताब्यात घेऊन धनंजय मुंडे यांना मतदान केल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
गजाभाऊ नावाच्या एक्स हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गोट्या गीते नावाचा इसम ईव्हीएम मशीनवरून धनंजय मुंडे यांना मतदान करताना दिसतोय. गजाभाऊने या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की “गोट्या गीतेचा अजून एक कारनामा, मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने टाकलेला आहे. तुम्ही स्पष्ट बघू शकता की त्याच्याबरोबर अजून कोणीतरी बाजूला मतदान करत आहे. हे बूथ कॅप्चर नसेल का?”
परळी मतदार संघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गैंग करायची
सगळे एकदम ट्रांसपेरेंट पोलिसांसमोर
असे परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख ह्यांनी सांगितले
वीडियो आहेत काही ठिकाणचे
कोण काय करणार… https://t.co/7BqoAUkXGw— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2025
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
गजाभाऊची ही पोस्ट रिपोस्ट करत आव्हाड यांनी म्हटलं आहे की “परळी मतदारसंघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. शाई लावायची आणि बाहेर जायचे… मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचं बटण दाबण्याचं काम ही गँग करायची. सगळे एकदम ट्रान्सपरंट (पारदर्शक)… हे सगळं पोलिसांसमोरच घडत होतं, असं परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितलं. मतदान केंद्राचे काही व्हिडीओ देखील आहेत. परंतु, याला कोण काय करणार, हे कायद्याचं राज्य आहे. पुढे कोणाला कंत्राट द्यायचं असेल तर त्यांनी वाल्मिक कराडशी संपर्क साधावा”.
