महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ ऑगस्ट – नवीदिल्ली – करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन लसी विकसित करण्यात आल्या आहेत. त्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. करोना व्हायरसवरील लस प्रत्येकाला मिळाली पाहिजे, हे सरकार सुनिश्चित करेल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते ७४ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत होते.
“करोना व्हायरसच्या लसीचे उत्पादन आणि वितरणाचा आराखडा ठरला आहे. कमीत कमी वेळेत करोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “भारतात करोना व्हायरसच्या लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. उत्पादन, वितरणाचा सर्व आराखडा ठरला आहे. प्रत्येक भारतीयाला ही लस मिळेल हे सरकार सुनिश्चित करेल” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“शास्त्रज्ञांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मोठया प्रमाणावर करोना लसीचे उत्पादन सुरु होईल. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वितरणाचा आराखडा जाहीर करु” असे मोदींनी सांगितले. आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिला जाईल.
“नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती घडवेल. डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर तुमच्या आरोग्य संबंधीचे सर्व अपडेट त्या हेल्थ आयडीमध्ये असतील. प्रत्येक भारतीयाचा स्वत:चा हेल्थ आयडी असेल. या आयडीमध्ये आजार, उपचार, डॉक्टर, हॉस्पिटलला भेट दिल्याचा, पेमेंट, औषध” याची सर्व माहिती असेल.