Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचा थरार पुन्हा रंगणार, दोघांना २५-२५ लाखांचं बक्षीस जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी ।। महाराष्ट्र केसरी २०२५ ची स्पर्धा वादग्रस्त ठरली होती. अंतिम आणि उपांत्य सामन्यामध्ये झालेल्या राड्यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवराज आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीदरम्यान शिवराजची पाठ न टेकताच त्याला पराभूत घोषित केल्याचा दावा केला जात आहे. त्यावेळी झालेल्या राड्यादरम्यान शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती. तर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने १६ सेकंद बाकी असताना सामना सोडला होता. दोघांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोघांमध्ये कुस्ती घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पृथ्वीराज मोहोळ याचे अभिनंदन, त्याने खेळण्याची तयारी दाखवली, हे खेळाडूच करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं असल्याचं म्हणाला यातून जे समजायचं ते प्रेक्षक आणि जनता समजली असेल. पृथ्वीराजने घेतलेला निर्णय काय आहे हे एखादा महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान समजू शकतो. परत ही कुस्ती सांगली शहरामध्ये लावून दोघांना २५-२५ लाख देऊन त्यांचा योग्य तो सन्मान लावून जनतेच्या मनतील संभ्रम दूर होईल. शिवराजला वाटत आहे त्याच्यावर अन्याय झाला आणि पृथ्वीराजला वाटत असेल की पंचांच्या निर्णयामुळे आपण महाराष्ट्रे केसरी झालो का? या सगळ्याच गोष्टीवर पडदा पडणार आहे. पृथ्वीराज मोहोळ हा २०२५ चा महाराष्ट्र केसरी असून त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. महाराष्ट्रात जो काही वाद झालेला आहे तो सांगलीत येऊन थांबवण्याची तयारी आम्ही केली आहे.

पृथ्वीराज मोहोळ याने कुस्तीची तयारी दाखवली आहे. आता शिवराज राक्षे याची वेळ घेत ही कुस्ती घेणार आहोत. ही कुस्ती सांगली शहरामधील तरुण भारत या स्टेडियमध्ये होणार असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. मी दोनवेळा महाराष्ट्र केसरी म्हणून सांगतो की शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या मनात संभ्रम झालेला आहे आणि तो थांबला पाहिजे. सांगली जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपर आहे. सांगलीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आणि हिंदकेसरी मारूती माने आणि सहा ते सात महाराष्ट्र केसरी झाले आहेत. केसरीवरून सुरू असलेला वाद सांगलीमध्ये मिटावा हा आमचा हेतू असल्याचंही पाटील म्हणाले.

दरम्यान, मी पैलवानच आहे, पैलवान कधीही कुस्तीसाठी तयार असतो. कधीही कुस्ती घेतली तरी तयारच असल्याचं पृथ्वीराज मोहोळ यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कुस्तीप्रेमीचं या लढतीकडे लक्ष लागलेलं असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *