महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. २९ मार्च ।। गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन आहे. राज्यात सध्या अवकाळीचे ढग बघायला मिळत आहेत. काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस पडतोय. हवामान खात्याकडून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा काही भागांमध्ये देण्यात आलाय. मात्र, विदर्भात सातत्याने उष्णता वाढताना दिसतंय. विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान हे ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे बघायला मिळाले. सांगलीमध्ये पावसाने हजेरी लावली.
मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कमी हवामानाचा पट्टा निर्माण झालाय. यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत मोठी वाढ झालीये. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्हांमध्ये तापमान हे ४१ अंशापर्यंत पोहोचले होते. यवतमाळ, परभणी, भंडारा, गडचिरोली, वाशिम याठिकाणी तापमान ४० अंशावर पोहोचले. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.
कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी या भागांमध्येही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुण्यात तापमान वाढताना दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २१°C च्या आसपास असेल.
कोकणात मागील काही दिवस उष्णतेच्या लाटा येताना दिसल्या. मार्च महिन्यात सुरूवातीच्या आठवड्यांमध्ये राज्यातील उष्णता वाढताना दिसली. मात्र, मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. चंद्रपूरमध्ये तापमान वाढत आहे. चंद्रपूरच्या ब्रह्यपुरीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. ब्रह्यपुरीत ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. लातूरमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार अवकाळी पाऊस पडल्याचे बघायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्येही पारा वाढताना दिसतोय. बीडमध्येही तापमानात वाढ झाली आणि आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.