राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २२ ऑगस्ट – राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील दोन दिवस शुक्रवार (ता. 21) आणि शनिवारी (ता. 22) मराठवाडा वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गुजरातच्या दक्षिण भागात व परिसरातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाच-सहा दिवसांमध्ये कमी झाली आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढे सरकले आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव कमी झाला. हे क्षेत्र वायव्य भागात सरकल्याने काही अंशी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले असले तरी पावसाचा जोर अधिक राहणार नाही. सध्या उडिसाच्या उत्तर भाग व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर उडिसाचा उत्तर भाग आणि झारखंड या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवसांत छत्तीसगड आणि मध्यप्रदेशाकडे सरकण्याची शक्‍यता आहे.

राजस्थानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर भारतात असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, अजमेर, गुना ते बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागापर्यंत आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. 23) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उत्तर भारतात काही प्रमाणात जोरदार पाऊस पडेल.

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. शनिवारी (ता. 22) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *