महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मे ।। कालपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. पाऊस हा वाढतच आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.आजपासून पुढील २-३ दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जर काही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असंही सांगण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
ऑरेंज अलर्ट
अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रातील प्रभावामुळे राज्यातील मान्सून दाखल झाला आहे. पुण्यात कालपासून पावसाने उच्चांकी गाठली आहे. दरम्यान, आजदेखील महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Rain Alert In Ratnagiri, Sindhudurg)
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातदेखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन् उत्तर कर्नाटक परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून जाणार आहे.
पूर्व- मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड अन् ओडिशापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. त्यामुळे उद्यापर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागात अजूनच जोरात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात कालपासून अनेक ठिकाणी पावसाने उच्चांकी गाठली आहे. पुणे, बारामती, इंदापूराच अतिवृष्टी झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यातदेखील पाऊस पडत आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाण्यासह अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, पुणे, लातूर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. राज्यात अनेक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.