Maharashtra Government : तीन लाख शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्याचे आदेश; या कारणामुळे केली कार्यवाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ ऑगस्ट ।। गेल्या सहा महिन्यांपासून अंत्योदय; तसेच प्राधान्य योजनेतून धान्य न उचलणाऱ्या ३ लाख ३३ हजार शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. त्यामुळे शिल्लक राहणारे हे धान्य प्रतीक्षा यादीवरील शिधापत्रिकाधारकांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

केंद्र सरकारकडून अंत्योदय; तसेच प्राधान्य योजनेत शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा केला जातो. त्यासाठी राज्यांना कोटा निर्धारित करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी; तसेच अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी कोटा वाढवून देण्यासाठी प्रस्ताव सादर केला जातो. मात्र सर्व राज्यांसाठी एकत्रित कोटा निर्धारित केला जात असल्याने जिल्ह्यांच्या प्रस्तावानुसार अतिशय कमी कोटा वाढवून मिळत असतो.

यावर उपाय म्हणून जे ग्राहक धान्य उचलण्यास पात्र असूनही धान्य उचलत नाहीत, अशा ग्राहकांचे धान्य बंद करून ते इतर प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना देण्यात यावे, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जेणेकरून प्रतीक्षा यादीवरील शिधापत्रिकाधारकांना ते उपलब्ध करून देता येणे शक्य व्हावे.

राज्यातील अशा सुमारे ३ लाख ३३ हजार ८८१ शिधापत्रिकांवरील धान्य गेल्या सहा महिन्यांपासून उचलले गेले नसल्याचे राज्य शासनाने निदर्शनास आणून दिले आहे. या सर्व शिधापत्रिकांवरील धान्य बंद करून इतर प्रतीक्षा यादीवरील शिधापत्रिकांना वितरित करण्यात यावे, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

यासंदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खातळ म्हणाले, ‘‘ या शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद केले असले, तरी त्यांची शिधापत्रिका रद्द होणार नाही. त्यांनी धान्याची मागणी केल्यास शिधापत्रिका पुनरुज्जीवित करून पुढील महिन्यात त्यांना धान्य देण्यात येईल.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *