मोशीच्या प्रदूषणावर महापौरांचा दणका; कारवाईचे आदेश

Spread the love

Loading

प्लास्टिक, टायर आणि भंगार जाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश; नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, महापौर रवि लांडगे यांचा इशारा.

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुलै २०२६ ।। मोशी परिसरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या प्रश्नाने अखेर महापालिकेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत धडक दिली असून महापौर रवि लांडगे यांनी या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेतील नागरिकांनी परिसरात वारंवार प्लास्टिक, टायर आणि इतर भंगार जाळले जात असल्याने निर्माण होणारा विषारी धूर, दुर्गंधी आणि त्यातून बिघडणाऱ्या आरोग्याविषयी महापौरांची भेट घेऊन निवेदन सादर केले. नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत महापौरांनी थेट महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन संबंधितांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकरणात महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला इशारा देत नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराला मुळीच पाठीशी घातले जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. “स्वच्छ हवा, निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित जीवनमान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या घटकांवर कठोर आणि प्रभावी कारवाई झालीच पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढत्या नागरीकरणाबरोबर पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य दिले पाहिजे, अन्यथा भविष्यात आरोग्यविषयक गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करण्याचे आदेश दिले. प्रदूषणाची कारणे शोधून तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अनधिकृत भंगार साठे हटविणे, प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. या बैठकीस माजी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि कविता आल्हाट यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापौरांच्या हस्तक्षेपानंतर मोशी परिसरातील वायू प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त पिंपरी-चिंचवड घडविण्याच्या दिशेने ही महत्त्वाची पायरी मानली जात असून, प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि परिसरात स्वच्छ, सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी महापालिका पुढील काळात अधिक प्रभावी उपाययोजना राबविणार असल्याने मोशीतील नागरिकांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *