महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ सप्टेंबर | रेल्वेच्या तिकीट बुकिंगमधील अनियमितता रोखण्यासाठी आता भारतीय रेल्वेनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टममध्ये मोठा बदल होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून हा नवीन नियम लागू होईल. रिझर्व्हेशन सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या १५ मिनिटांत आधार प्रमाणीकरण असलेले यूजर्सच ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकतील. आयआरसीटीसीची वेबसाइट आणि मोबाइल अॅपवरच ही सुविधा असेल.
तिकीट आरक्षणात अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ती रोखून प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने नवीन नियम केला आहे. संबंधित ट्रेनसाठी आरक्षित तिकीट बुकिंगची वेळ सुरू झाल्यापासून १५ मिनिटांच्या आत फक्त आधार प्रमाणित यूजर्सना आयआरसीटीसीची वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करता येणार आहे. सध्याच्या घडीला केवळ तत्काळ तिकीट बुकिंगसाठीच हा नियम लागू आहे.
थेट प्रवाशांनाच होणार फायदा
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आरक्षित जनरल तिकिटाची बुकिंग रिझर्व्हेशन सुरू झाल्यापासून १५ मिनिटांमध्ये आधार प्रमाणीकरण असलेल्या यूजर्सना आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर करता येणार आहे. अनेकदा ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. त्यामुळं निराशा पदरी पडते. आता रेल्वेच्या या सुविधेमुळं प्रवाशांना फायदा होणार आहे.
काउंटर तिकीट बुकिंगच्या नियमात कोणताही बदल नाही
हा नवीन नियम फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी लागू असणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संगणीकृत पीआरएस काउंटरवर तिकीट बुकिंग करण्यासाठी वेळ आणि प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच अधिकृत तिकीट एजंटसाठी आधीपासून लागू असलेली १० मिनिटांची मर्यादा कायम असणार आहे.
रेल्वेने हा बदल लागू करण्यासाठी सीआरआयएस अर्थात सेंटर ऑफ रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम आणि आयआरसीटीसीला आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित नियम आणि त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासही विभागीय रेल्वे प्रशासनाला सांगितले आहे. तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि एजंटद्वारा होणाऱ्या तिकीट बुकिंगला आळा बसेल. प्रवाशांना ठरवून दिलेल्या वेळेत तिकीट बुकिंग करता येणार आहे. डिजिटल सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. आगामी काळात सण-उत्सव येणार आहेत. त्या काळात प्रवाशांना या सुविधेचा थेट फायदा होणार आहे.