महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | आध्यात्मिकताच मानवी एकता मजबूत करू शकते आणि माणसांना एकमेकांच्या जवळ आणून परस्पर प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकते. त्याच हेतूने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता जी यांच्या आशीर्वादाने पुणे झोन मधील संत निरंकारी सत्संग भवन, रुपीनगर येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन २७० युनिट रक्त संकलन करण्यात आले. औंध रक्तपेढी यांनी १५८ युनिट तसेच संत निरंकारी रक्तपेढी, मुंबई यांनी ११२ युनिट रक्त संकलन करून विशेष योगदान दिले.
या शिबिराचे उद्घाटन श्री. गिरधारीलाल मतनानी (सेक्टर प्रमुख, पिंपरी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत निरंकारी मिशनद्वारे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा रुपीनगर परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी रुपीनगर परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश पोहोचविण्यात आला.आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार प्रल्हाद गोगरकर(प्रमुख,रुपीनगर) यांनी व्यक्त केले.